Tuesday, April 27, 2010

हसण्यासाठी जन्म आपुला

विनोद हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. मराठीमध्ये अनेक विनोदी लेखकांनी व नाटककारांनी अनेक नाटके लिहिली. मराठी विनोदी साहित्य याबाबतीत खूप समृद्ध असल्याचे दिसते. याशिवाय मराठी चित्रपटांमध्येही विनोदी चित्रपट मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. मुंबईच्या कॅमेलिया फिल्मसच्या ज्युडिथ बेंजामिन यांनी मराठीत ’हसण्यासाठी जन्म आपुला’ या नावाने काही लघू नाटिका तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे यामध्ये मराठीतील बऱ्याच नामांकित विनोदी कलाकारांनी काम केले होते. राजश्री मराठी या वेबसाईटने या सर्व लघू नाटिका ’यूट्यूब’ वर अपलोड केल्या आहेत. सर्वसामान्य मराठी माणसाच्या जीवनातील छोटे छोटे प्रंसंग विनोदाची झालर देऊन उत्तमरित्या सादर करण्यात सादर केले गेले आहेत. जवळपास सर्वच नाटकांची कथा ही जयवंत दळवी तसेच वसंत सबनीस यांनी लिहिली आहे. अगदी विरंगूळा म्हणून या मराठीतील या उत्तम कलाकृती बघायला हरकत नाही...

१. बंडू आणि बटाटे पोहे
अशोक सराफ सारखा तगडा कलाकार असल्याने या नाटिकेबद्दल तर विचारायलाच नको. बंडूची भूमिका यात अशोक सराफने केली आहे. माणूस काही गूण जन्मजातच घेऊन येत असतो, हाच संदेश ही नाटिका देऊन जाते.

२. फ्रिज
रोहीणी हट्टंगडी व दिलिप प्रभावळकर यांची हे नाट्य होय. चाळीत राहणाऱ्या माणसाच्या घरी प्रथमच जेव्हा फ्रिज येतो तेव्हा त्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्याची ही कहाणी (खरं तर कर्मकहाणी) होय.

३. तसदी बद्दल क्षमा असावी
आपण तसदी बद्दल क्षमा असावी, हे वाक्य अनेकदा किती सहजपणे म्हणून जातो. पण, समोरच्याला जर जास्तच त्रास वा तसदी देत असेल तर त्याची बिचाऱ्याची काय हालत होईल, याचे नाट्य यात विजय कदम व राजा गोसावी यांनी सादर केले आहे.

४. कुंकवाचा करंडा
सामान्य माणूस वा संसारी माणूस खूप विसराळू असतो. एका कुंकवाच्या करंड्यापायी त्याला किती यातना सोसाव्या लागतात, याचे चित्रं यात पाहायला मिळेल. सुरेश भागवत यांनी यात मुख्य भूमिका केली आहे.

५. मोदी आणि मोदी
खरं तर ही विनोदी नाटिका नाहीच. त्याला भावनेचा आधार देण्यात आला आहे. सतिश शहा यात मोदी झाले आहेत. व त्यांचे दु:ख ते इतरांपासून कसे लपवून ठेवत असतात, याचे चित्रण यात केले गेले आहे.

६. घोडा
एका घोड्याच्या पुतळ्यावरून एक लहान मुलगा किती जणांना वेडे बनवतो, याचे चित्रण ’घोडा’ या लघूनाटिकेत आहे. आपल्या मामाला तो अगदी सहजपणे एका विचित्र संकटातूनही सोडवतो.

७. कुणाचा तरी काका मरतो
आत्माराम भेंडेची मुख्य भूमिका असलेले हे नाटक होय. कुणाचा तरी काका मेल्याची वार्ता देण्यासाठी त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याची ही कहाणी होय. पूर्वी फोनवरून निरोप प्रसारित करणे म्हणजे एक मोठे जिकिरीचे काम होते...!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com